Friday, 5 January 2018

छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत शिखरशिंगणापूर बद्दल वाचा थोडक्यात

शिखर शिंगणापूर मोठा महादेव

महाराष्ट्र हा संतानी पराक्रमी पुरुषांनी आणि देवीदेवतांच्या वरदहस्तानी फुलवलेला संपन्न प्रदेश आहे. महाराष्ट्रातील असंख्य धार्मिक स्थळे खूप प्राचीन, स्वयंभू आणि जागृत इतिहास असूनही महाराष्ट्राच्या नकाशावर अनभिज्ञ आहेत. यातीलच एक धार्मिक ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर


शिखर शिंगणापूर इतिहास

शिखर शिंगणापूर येथून दहा मिनिटांच्या अंतरावर गुप्तलिंग हे देवस्थान आहे. शिखर शिंगणापूरची कथा हि गुप्तलीगापासूनच सुरु होते.


अख्यायिका अशी आहे कि गुप्तलीगावर श्री शंभू महादेव घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती माता भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटता क्षणी त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वती मातेने श्री शंभू महादेवांची क्षमा मागितली. पार्वती मातेच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.


गुप्तलिंग हे सातारच्या छत्रपतींच्या शाही घराण्याचे खाजगी देवस्थान आहे. या ठिकाणी श्रमदानातून आणि छत्रपतींच्या फंडातून जीर्णोद्धार केला गेला आहे. गुप्तलिंगावर आजही दोन कुंडे प्रवाहित आहेत. एक जटा कुंड ज्या ठिकाणी श्री शंभू महादेवानी आपल्या जटा आपटल्या होत्या आणि दुसरे आहे भागीरथी कुंड जे पार्वती मातेचे कुंड म्हणून ओळखले जाते.


गुप्तलिंगाच्या मंदिरापर्यंत जाण्याकरिता प्रशस्थ पायऱ्यांची वाट आहे. आपली गाडी पार्क करून पाच ते दहा मिनिटे चालत गेल्यावर थंडगार गुप्तलिंगाच्या मंदिराचे दर्शन होते. रणरणत्या उन्हातही गुप्तलिंग यात्रेकरूना थंडावल्याचा अनुभव देऊन जाते. गुप्तलींगाचे दर्शन घेतल्याशिवाय श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरचे दर्शन पूर्ण होत नाही.



 

शिखर शिंगणापूरच यात्रा

 

शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेलाहोते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात.


एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राज घराण्यातील युवराज किव्हा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात कि देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही. राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेऊन देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली, राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते.


शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी हि पहिलीच यात्रा असावी.


श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अदभूत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावडभुतोजी तेली यांची असते.


भुतोजी तेली यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रे अगोदर हि मानाची कावड सासवड वरून प्रस्थान करते. फार पूर्वीपासून हि प्रथा चालू आहे. देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेऊ नये ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्तीत होणार नाही. या विचारापोटी भुतोजी तेली शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या घरादारास आग लावीत असत. निसंकोच मनाने आणि देवाच्या ओढीने त्यांची कावड द्वादशीलाशिंगणापूरच्या पायथ्याशी पोहचत असे.


दुपार नंतर हि कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे द्रुश्य फारच मोहक असते. सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी धोंड्याच्या मुंगी घाटातूनच वर मार्ग काढतात. मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. पूर्वी जेव्हा भुतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपवून घरी जात त्यावेळी त्यांचे घर व दार सर्व सुखरूप असे. श्री शंभू महादेवाची लीला अपरंपार आहे. यातच श्री शंभू महादेवाच्या चमत्काराची प्रचीती येते.


सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात. तुम्हीही या सोहळ्यात शामिल व्हा आणि देवाचा हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पहा मगच तुम्हाला श्री शंभू महादेवाच्या अस्तित्वाची खरी प्रचीती येईल.


कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. कावड सहा कवड्यांच्या खांद्यावरून नेली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. मौज म्हणून कवड्यामध्ये रस्सीखेच खेळली जाते. कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जन कावडीचे दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे.


आजही भुतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात. येताना प्रतीकात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड शिखर शिंगणापूरच्या दिशेने चालू लागते. द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरु होतो. सार्वजन भक्तीत न्हाऊन आपापल्या घरी जातात.



 

 


No comments:

Post a Comment